कोल्हापूर (प्रतिनिधी) : सदृढ समाजासाठी महिलांचे आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबाची काळजी घेणारी महिला कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. ती निरोगी रहावी. ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी. यासाठी जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराचा शहरातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी केले.

जयश्री चंद्रकांत जाधव फाऊंडेशन व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद आश्रम संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल होते. मंगळवार पेठेतील साठमारी नजीक स्वामी विवेकानंद आश्रम येथे शिबिर झाले. या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. दश्मिता जाधव म्हणाल्या, महिला विविध क्षेत्रात काम करते, तेव्हा तिला कुटुंबासोबत मुलांसोबत अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. हे सर्व करण्यासाठी तिला मानसिक व शारीरिक समतोल असणे खूप गरजेचे आहे.  यासाठी महिलांनी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. रोज कमीत कमी एक तास व्यायाम करावा, योग्य आहार घ्यावा व आपल्या मैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे. या आरोग्य शिबिरात ३३० महिलांची तपासणी करण्यात आली.

माधवबाग हॉस्पिटलच्या डॉ. अश्विनी अवताडे, डॉ. वैजयंती बागेवाडी, कम्युनिटी हेल्थ एक्झिक्युटिव्ह विक्रम पाटील, शंभुराजे पाटील, सुषमा माने यांनी महिलांना वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार केले. स्वामी विवेकानंद आश्रमचे विश्वस्त किरण अतिग्रे, विश्वास माने आदी उपस्थित होते.