मंगळवेढा (प्रतिनिधी) : तालुक्यातील खोमनाळ व गुंजेगाव येथील उमेदवाराला समान मते पडल्याने त्यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले. खोमनाळ येथे कल्पना पवार आणि अश्विनी सुळकुंडे या महिलांंना समान मतदान (२२७) पडल्यामुळे चिठ्ठीवर कल्पना पवार या विजयी झाल्या. तसाच प्रकार गुंजेगाव येथे झाला. राहुल खांडेकर व पांडुरंग ढोणे यांना समान मतदान (३११) झाले. चिठ्ठीवर राहुल खांडेकर यांना विजयी घोषित करण्यात आले.

ग्रामपंचायत निकालावर समविचारी गटाचे वर्चस्व राहिले आहे. गावगाड्यातील सत्तेसाठी अनेकांनी आपल्या सोयीची आघाडी करत समविचारी नाव दिले होते. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज शासकीय गोदामात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अधिकारात ११ टेबलवर दोन फेऱ्यात ही मतमोजणी झाली. पहिल्या फेरीमध्ये येड्राव, गोणेवाडी, तळसंगी, शिरनांदगी, पाटकळ, गुंजेगाव, खोमनाळ, मारापूर, डोंगरगाव,सोड्डी,पौट, ग्रामपंचायतची मतमोजणी करण्यात आली, तर दुसऱ्या फेरीमध्ये ढवळस, बावची, भालेवाडी, मारोळी, राजापूर या ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली.

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचे आणि लक्षवेधक ठरलेल्या तळसंगी ग्रामपंचायत निवडणुकीत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित कायम राहिले असून, सरपंचपदाच्या उमेदवार २६८ मतांनी विजयी झाल्या. भालेवाडी येथे समविचारीचे वर्चस्व कायम राहिले. येड्राव येथे माजी सभापती उपसभापती काशिनाथ पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. संजय पाटील सरपंचपदी विजयी झाले.

बावची येथे आ. समाधान आवताडे यांच्या गटाला सत्ता गमवावी लागली. त्या ठिकाणी भालके परिचारक पुरस्कृत सर्वच सदस्य विजयी झाले. सरपंचपदी दशरथ गाढवे विजयी झाले. मारोळी येथे दामाजीचे संचालक बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व सदस्य मोठ्या फरकाने विजयी झाले. राजकुमार पाटील सरपंचपदासाठी विजयी झाले. सोड्डीत यादप्पा माळी गटाचे पाच सदस्य विजयी होत गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली; मात्र त्यांना थेट सरपंचामुळे सरपंचपद गमवावे लागले. त्या ठिकाणी आ. समाधान आवताडे यांच्या गटाचे शांतप्पा बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गटाने सत्ता मिळवली. पाटकळ येथे सरपंचपदासाठी आठ जण आखाड्यात होते भालके व सिद्धेश्वर अवताडे यांच्या गटाने सत्ता ऋतुराज बिले हे सरपंचपदी विराजमान झाले. मारापूर येथे आमदार अवताडे समर्थक विनायक यादव विजयी झाले.

गुंजेगाव येथे भालके-अवताडे पुरस्कृत गटाने सत्ता मिळवली. शिरनांदगी येथे मायाका थोरबोले यांना दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. डोंगरगाव येथे झालेल्या पंचरंगी लढतीत सारिका खिलारे या विजयी झाल्या. हाजापूर येथे पाच सदस्य यापूर्वी बिनविरोध झाले होते. दोन सदस्य व एका सरपंचपदाच्या निवडीत माधवानंद आकळे यांच्या नेतृत्वाखाली मैना देवकुळे या विजयी झाल्या. तेथे समविचारी गटाच्या रोहिणी हेंबाडे विजयी झाल्या. निकालानंतर आ. अवताडे गटाने दहा ग्रामपंचायती, तर भालके गटाने १० ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला. परिचारक गटाने देखील आम्ही तालुक्यात नंबर वन असल्याचा दावा केला आहे.