सांगोला (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील एकीकडे पक्षीय, पक्षांतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात दिसून येत असले तरी सांगोल्यात मात्र पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारणावर मोठ्या प्रमाणावर भर दिसून येत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हे ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकत्रित लढवित आहेत. दोन्ही गटांचे स्थानिक कार्यकर्तेही आमचा पक्षच ‘आबा’ व ‘बापू’ असल्याचे उघडपणे बोलून दाखवत आहेत.

जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले व भाजप-बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन झाले. याचा राजकीय परिणाम सांगोला तालुक्यात फार मोठा दिसून आला नाही.  विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीकडून निवडणूक लढवणारे आमदार शहाजी पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी उघडपणे पाठिंबा देऊन आमदार पाटील यांच्या विजयात मोलाची साथ दिली होती.

दोन्ही आजी-माजी आमदार यांचे पक्ष वेगळे असले, राज्यात दोघांच्या पक्षीय मोठा विरोधाभास असला तरी सांगोल्यात मात्र या दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी  सर्वच कार्यक्रमात, निवडणुका एकत्रित हातात हात घालून काम करीत आहेत. अनेक निवडणुका हे दोघे एकत्रित येऊनच लढवत आहेत. त्यामुळे सांगोला तालुक्यात सध्या तरी पक्षापेक्षा दोघांच्या व्यक्तीकेंद्रित राजकारणावरच मोठा भर असल्याचा दिसून येत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दोघांचे कार्यकर्तेही एकत्रित येत पक्षांपेक्षा आमचा पक्ष ‘आबा’ व ‘बापू’ असल्याचे ते उघडपणे गाव कट्ट्यावर बोलून दाखवत आहेत.

दीपक आबा हे माझ्या भावाप्रमाणे असून, मी कधीच त्यांना अंतर देणार नसल्याचे आमदार शहाजी पाटील बोलून दाखवत आहेत. राजकारणापेक्षा तालुक्याच्या विकासासाठी आम्ही प्राधान्य देत असतो. तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच मुद्दा केंद्रबिंदू मानून आम्ही एकत्रित आलो आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले.

आगामी निवडणकांकडे लक्ष

स्व. माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांकडे शेतकरी कामगार पक्षाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या एकत्रितपणामुळे या निवडणुकांकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.