कोल्हापूर (प्रतिनिधी) : संवाद, सल्ला आणि चर्चा हा लोकशाहीचा आत्मा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचा प्रश्न हा सहिष्णुतेबरोबरच सहअस्तित्वाचा जास्त वाटत होता. त्यामुळे त्यांची भारताची संकल्पना ही सर्वसमावेशक आणि प्रत्येक घटकाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत आयोजित कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानामाला (पुष्प सातवे) ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारताच्या संकल्पनेवर मांडणी केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर हे होते. इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अरुण भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

किशोर बेडकिहाळ म्हणाले, नेहरू हे नाव पुसण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु नेहरुंना वगळून भारतीय राजकारणाची चर्चा शक्य नाही. देशातील लोकशाहीच्या जडणघडणीत नेहरूंचे योगदान अमूल्य आहे. संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, असे नेहरूंची भूमिका होती म्हणून त्यांनी नेहमीच विरोधी पक्षातील सदस्यांच्या सूचनांचा व सल्ल्यांचा सन्मान केला. डॉ. अशोक चौसाळकर यांनी नेहरूंच्या भारताच्या संकल्पनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.