मुंबई (प्रतिनिधी) : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने मोहीम उघडली आहे. राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करून केलेली कारवाई यशस्वी झाली आहे. केवळ तीन महिन्यांत ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आली असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले.

संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व कारवाई केली. परिणामी त्या त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून, ५ दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून, अशा पन्नास हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीज वापराएवढी ही वीज आहे.

महावितरणने वीजगळती रोखण्यासाठी आक्रमकपणे काम सुरू केले आहे. वीज गळतीच्या बाबतीत टॉपर्स निश्चित करून कारवाई करण्याची रणनीती आखली आहे. त्या त्या झोनमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निश्चित केलेल्या फीडर्सची जबाबदारी देण्यात आली. ही मोहीम उद्दिष्ट गाठेपर्यंत पुढे चालू ठेवण्यात येणार आहे.