गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत रणधुमाळीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३४ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यापूर्वीच बटकणंगले आणि कडलगेने बिनविरोधची घोषणा केली होती, तर आज कौलगे आणि कडालच्या उमेदवारांनी अतिरिक्त अर्ज मागे घेत बिनविरोधवर शिक्कामोर्तब केले.
इतर ३० गावांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, काही गावांत तिरंगी तर काही गावांत एकास एक अशी दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. हसूरवाडीत मात्र चौरंगी लढत होणार असून, वैरागवाडीत सदस्य पदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या असून, फक्त सरपंचपदासाठी दोघात रस्सीखेच होणार आहे.
तालुक्यातील मोठी गणली जाणाऱ्या महागाव, भडगाव, कडगावसह हरळी खुर्द, सांबरे आदी गावात तिरंगी लढती होणार असून, करंबळी, नेसरी, खमलेहट्टी, बेकनाळ, मुगळी, कुमरी आदि गावात दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे; मात्र बहुतांश गावांत अपक्षांची आणि बंडखोरांची संख्या जास्त असून, त्यातूनही नव्या आघाड्या आकाराला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माघारीची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असली तरी दिवसभरात आघाड्यांची रचना करण्यात व्यस्त असणाऱ्या नेते कार्यकर्त्यांनी ऐनवेळी माघारीसाठी रीघ लावली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. सायंकाळचे साडेसात वाजेपर्यंत प्रशासनाला निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची गावनिहाय आकडेवारी प्रसिद्ध करता आली नाही.