मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकने महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केल्यानंतर आता महाराष्ट्राने कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र राज्याकडून आता सीमाभागातील बेळगावसह ८६५ गावांतील संस्था आणि संघटनांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांनादेखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सीमाप्रश्नी नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुरुवारी या संबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.