कोल्हापूर (प्रतिनिधी) : खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा योग्य बंदोबस्तामध्ये पार पाडल्याबद्दल माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले आहेत.
याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना आ. पाटील यांनी म्हटले आहे की, गेले १५ दिवस महाराष्ट्रात राहुल गांधी यांची ऐतिहासिक ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक रोज सहभागी होत होते. त्यांच्या दोन्ही सभांना तर लाखोंची गर्दी होती. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या यात्रेत विघ्न आणू पाहणाऱ्या लोकांची ईच्छा यशस्वी होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस सदैव कार्यरत होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दौऱ्याचा नियोजनात स्वतः लक्ष घातले. शिवाय हे अधिकारी कार्यरत दलाचे मनोधैर्य वाढवायला रोज स्वतः चालत होते. अशी पदयात्रा व त्यात मोठ्या संख्येने सामील होणारी जनता हा पोलीस दलासाठी पूर्णतः नवा अनुभव होता; मात्र तरीसुद्धा पोलीस दलाने आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. पोलीस, गुप्तवार्ता विभाग, ट्रॅफिक, होमगार्ड, एसआरपीएफ अशा सर्वच विभागांनी आपले काम चोख निभावले. राज्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण यशस्वीरीत्या व निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल पोलीस दलाचे आभार मानतो, असे आ. पाटील यांनी म्हटले आहे.