मुंबई (प्रतिनिधी) : श्रद्धा वालकरच्या खुनी, हत्याराविरोधात खटले चालवू नयेत, यावर जर कोणी राजकारण करत असेल, तर ते बंद केले पाहिजे. आरोपीवर खटले न चालवत जो परिस्थितीजन्य पुरावा समोर दिसतोय त्याआधारे त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील एका मुलीची हत्या झाली ती अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. समाजमाध्यमांमध्ये ओळखी होतात त्या ओळखीचे रुपांतर अशाप्रकारच्या भयंकर नात्यामध्ये होते. यामध्ये या मुलीला तुकडे तुकडे करुन मारले. त्या मुलीच्या वडिलांची मुलाखत वाचली. त्या मुलीच्या वडिलांचा आक्रोश आणि कुटुंबाचा आक्रोश त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत.

त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न झाला, कोणत्या गुंगी आणि धुंदीमध्ये ही मुले जगतात हे परत एकदा कळले. आपला जीव गमावून बसली. महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील मुलींनी आवाहन आहे की, जर आपण नारीशक्ती, महिला सन्मानाच्या गोष्टी करतो त्यावेळी मुलींनी सावधपणे जगण्यास शिकले पाहिजे. अशाप्रकारे फसवून जे केले जात आहे, ही विकृती आहेच; पण हे विकृतीच्या पुढचे पाऊल आहे. याविषयी रोज जी माहिती येत आहे ती थरारक आहे. समाजातील मुलींना पाहतो, आपण कोणत्या समाजात जगतो आणि वावरतो यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण जर कोण करत असेल, तर या समाजाचे शत्रू आहेत. असेही राऊत म्हणाले.