कुरुंदवाड (प्रतिनिधी) : गोरगरीब व कष्टकरी जनता विश्‍वासाच्या बळावर पोटाला चिमटा काढून काटकसरीने भरलेली भिशी हेरवाड गावातील एकाने बुडविल्याने यामध्ये सुमारे ५० लाखांहून अधिक रक्कम असल्याचे समजते. त्यामुळे गोरगरिब जनतेच्या हक्काचे पैसे लुटणार्‍या त्या भिशीधारकाला कोणाचे भय आहे का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून गावातील अनेक वर्गणीधार आपली भिशी त्याच्याकडे प्रामाणिक पणे भरत आले आहेत; मात्र कोरोनाचे कारण सांगत संबंधित भिशीधारकाने सुमारे ५० लाखांहून अधिक रुपयांची गोळा झालेली भिशी थकविल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक अडचण झाली आहे. यामध्ये काही मध्यवमर्गीय सभासद असल्याने त्यांच्याकडून संबंधित भिशीचालकाने ठेव पावत्या ठेवून घेतल्या आहेत; मात्र त्या ठेव पावत्याचाही पत्ता नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे पैसे मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचे पैसे काढून देण्यासाठी शिरोळ तालुक्यातील सामाजिक संस्था तसेच अन्याय निवारण संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.