मुंबई (प्रतिनिधी) : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे यांचे रात्री एक वाजता विलेपार्ले पूर्व येथील घरी निधन झाले. काल रात्री घरीच त्यांना अचानक फिट येऊन ते पडले आणि त्यांना ताबडतोब नानावटी इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले. तेथे गेल्यावर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या काही काळापासून ते लाईमलाईटपासून दूर होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषीकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिका असा त्यांचा एकूण अभिनय प्रवास आहे. १९८२ साली सुनील शेंडे यांनी गांधी या चित्रपटातून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.
(१९८९) निवडुंग, (१९८९) मधुचंद्राची रात्र, (१९८९) ईश्वर, (१९९१) जसा बाप तशी पोर, (१९९१) नरसिम्हासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. राजकारणी, पोलीस ऑफिसर, डाकू, सायंटिस्ट अशा विविधांगी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीतून रजा घेतली होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा आजार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे; मात्र एपिलेप्सीच्या किरकोळ त्रासातून ते जात होते.