वारणा (प्रतिनिधी) : जय शिवराय किसान संघटनेचे विविध मागण्यांबाबत आसुर्ले पोर्ले येथील दत्त दालमिया शुगर कारखान्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आज (शनिवार) सहाव्या दिवशी आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला.
यावेळी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी, दोन दिवसांमध्ये कारखाना प्रशासनाने जर तोडगा काढला नाही, तर सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या आंदोलनामध्ये सक्रिय होणार आहे. या कारखान्याच्या सर्वच हिशोबांची कागदपत्रे तपासून तोडणी वाहतूक खर्चात केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करणार आहे. ज्यादा दाखवलेली रक्कम शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींचा अवलंब करणार असल्याचे सांगितले.
तर काल प्रशासनाने पोकळ चर्चा करून संघटनेच्या भावनांशी खेळत असल्याचे आझाद हिंद क्रांतीचे मुकुंद पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील, अभिषेक पाटील, वसंत कोरवी, अमरसिंह दळवी, बसवराज हादिमणी, सतीश पाटील, युवराज पाटील, चंद्रकांत गराडे, यादव भादोले, डॉ. सचिन पवार, संभाजी कांबळे आदी उपस्थित होते.