जठारवाडी (प्रतिनिधी) : पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबियाना आ. हसन मुश्रीफ फाउंडेशनने दिलासा दिला. फाउंडेशनचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी या आठही कुटुंबांना भेटी देऊन प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदतीचे धनादेश दिले. एक आठवड्यापूर्वी आ. मुश्रीफ यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी ही मदत जाहीर केली होती.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेश लाटकर,  जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई-भामटेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, सरपंच नंदकुमार खाडे, माजी जि.प. सदस्य राजाराम कासार, वसंतराव घोडके आदी उपस्थित होते.