पुणे (प्रतिनिधी) : ‘गेल्या पाच-सहा वर्षांत मला विदेशात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. माझा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी ४ तारखेला रात्री उशिरा दीड वाजता विमान होते आणि गुरुवारी रात्री उशिरा परतणार होतो; पण अजित पवार नाराज आहेत, कुठेतरी गेलेत अशा चर्चा उठवण्यात आल्या. माझ्याशिवाय यांचे काय नडते मला कळत नाही. दादाला काय खासगी आयुष्य आहे की नाही,’ असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला.

अजित पवार नाराज आहेत. कुछ तो गडबड है. त्यांची कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही, या सगळ्या चर्चांना अखेर दस्तुरखुद्द अजित पवारांनीच उत्तर देत पूर्णविराम दिला आहे. यावेळी त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलेल्या आरक्षणाचे स्वागतही केले. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर झाले. या शिबिराच्या उद्घाटनाला अजित पवार उपस्थित होते. मात्र, समारोपाला ते हजर नव्हते. त्यामुळे नाना चर्चा सुरू झाल्या होत्या.

शिवसेनेच्या नीलीम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही, असे वक्तव्य केले होते, तर अजित पवारांची राष्ट्रवादी शिबिराच्या समारोपाकडे पाठ म्हणजे ते नाराज तर नाहीत ना. गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे, कुछ तो गडबड है, असे खोचक ट्विट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केले होते.

विशेष म्हणजे शिबिराच्या शेवटच्या दिवशी आजारी असलेले शरद पवार थेट ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून शिर्डीला पोहचले. त्यांना भाषण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांचे भाषण शेवटी दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले. या कार्यक्रमानंतर शरद पवार पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तर सुप्रिया सुळेंविरोधात सत्तारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही त्यांची प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे या चर्चेने जोर धरला होता. मात्र, त्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नाराजीच्या चर्चेला अजित पवारांनी अफवा म्हणत पूर्णविराम दिला आहे. मावळ येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, माझा सहा महिन्यांपू्र्वी दौरा ठरलेला होता. त्यासाठी अगोदरच तिकिटे काढून ठेवलेली होती. त्यामुळे मी पाच-सहा दिवस सक्रिय नव्हतो. त्यानंतर मी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.