मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. त्याला कारणही तसंच आहे. राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरातून अजित पवार आजोळी गेल्याचे सांगितले जात असलं तरी अजित पवार अचानक पाच दिवसांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार शिर्डीच्या शिबिरातूनच ४ नोव्हेंबर रोजी आजोळी देवळाली प्रवराला गेल्याची कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. खरे तर अजित पवार अद्यापही देवळाली प्रवराला पोहोचलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही स्वतः शरद पवारांनी रुग्णालयातून शिर्डीत हेलिकॉप्टरने येत हजेरी लावली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील राज्यस्तरीय शिबिरानंतर अजितदादा कुठेही दिसलेले नाहीत. नेहमीच मीडियाच्या गराड्यात राहणारे अजित पवार अचानक पाच दिवस गायब झाल्याने नव्याच चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार नॉट रिचेबल झालेले असतानाच मनसेही राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे नेते गजानन काळेंनी ट्विट करत अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर नाहीत ना, असा टोलाही आमदार अमोल मिटकरींना लगावला आहे. अमोल मिटकरींना यासंदर्भात खुलासा करण्याचंही आव्हान केलंय. अजित पवारांनी कंपू बदलला तर तुमची पळता भुई थोडी होईल, असे म्हणत मनसे नेते गजानन काळेंनी मिटकरींच्या आडून राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला आहे.. यापूर्वीही अजितदादा दिल्लीच्या पक्षाच्या अधिवेशनातून शेवटच्या दिवशी गायब झाले होते. त्यातच गेले काही दिवस अजितदादा राष्ट्रवादीत नाराज असल्याचे बोलले जात आहे.