चंद्रपूर : पृथ्वी वगळता काही ग्रहांवर जीव असू शकतात, याचा शोध शास्त्रज्ञ मागील अनेक वर्षांपासून घेत आहेत. यात त्यांना अद्याप यश आले नाही. अशात शास्त्रज्ञांना अंतराळाच्या एका कोपऱ्यातून अवघ्या ८२ तासांत जवळपास १८६३ सिग्नल्स मिळाले आहेत. यामुळे एलियन्स असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खरंच एलियन असतील आणि ते पृथ्वीवर आक्रमण करतील तर काय होणार? यावर खगोलशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी या निव्वळ कल्पना असल्याचे सांगितले आहे. पृथ्वी वगळता इतर कुठल्यातरी ग्रहावर जीव आहे, याचा ठोस पुरावा सध्यातरी शास्त्रज्ञांना मिळाला नसल्याचे चोपणे यांनी सांगितले. शास्त्रज्ञांना सतत अंतराळाच्या एका कोपऱ्यातून पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळत आहेत. यांना रेकॉर्ड करण्यात आले. हे नवीन प्रकारचे रेडिओ सिग्नल आहेत, जे सामान्य फास्ट रेडिओ बर्स्ट (FRB) पेक्षा वेगळे आहेत. शास्त्रज्ञांनी रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमातून त्या दिशेने ९१ तास सतत लक्ष ठेवले, ज्या दिशेने सिग्नल्स येत होते. या तासांपैकी ८२ तासांत जवळपास १८६३ सिग्नल्स आले आहेत.

हे संकेत आपल्या पृथ्वीपासून दूर असलेल्या एका आकाशगंगेतून येत आहेत. जिथून सिग्नल येत आहेत, त्या ठिकाणाला FRB 20201124A असे नाव देण्यात आहे आले आहे. हे चीनच्या फाईव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपने (फास्ट) पकडले आहे. चीनमधील पेकिंग विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ हेंग शू या संकेतांचा अभ्यास करत आहेत. अंतराळाच्या एका कोपर्‍यातून पृथ्वीवर सिग्नल मिळत असल्याचा बातम्या माध्यमात झळकल्या. त्यामुळे हे सिग्नल चर्चेचे विषय ठरले आहेत.

खरंच एलियन्स आहेत का? असतील तर ते कसे दिसतात? त्यांच्यापासून पृथ्वीला धोका होऊ शकतो काय? ते आपले मित्र आहेत की शत्रू? असे नानाविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले, ‘मुख्य प्रश्न हा आहे की एलियन्स आहेत की नाही? असतील तर ते प्रगत आहेत काय? सध्या तरी एखाद्या परग्रहावर जीवन असेल असा ठोस पुरावा मिळालेला नाही. या नुसत्या कल्पना आहेत.’