मुंबई (प्रतिनिधी): राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले आहे. अब्दुल सत्तार यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून त्यांचे कान टोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही तासांपासून हा मुद्दा प्रचंड तापवला आहे. त्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे किंवा हा वाद शांत करण्यासाठी काय केले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण बाराच्या सुमारास सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले.

अब्दुल सत्तार यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान आणि औरंगाबाद येथील घरापर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धडक मारली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर स्वस्थ बसून देणार नाही, असे विद्या चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.