मुंबई (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे खूप होते ही समस्या अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे ओझे कसे कमी करता येईल याबाबत सतत सरकार आणि काही सामाजिक संस्था विचार करत असतात; मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरे पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकार शालेय विद्यार्थ्यांचं ओझे कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पाने कशी लावता येतील किंवा नोट्स काढताना पुस्तकांमध्येच कशा कदगत येतील यावर विचार सुरु आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरे पान लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी आणि पालकवर्ग सतत दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून मागणी करत होते. अनेक विद्यार्थ्यांना या ओझ्यामुळे काही त्रासही सहन करावे लागत होते. आता शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असे सरकारचे म्हणणे आहे.