चंद्रपूर (प्रतिनिधी) : नुकतेच २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून ८ नोव्हेंबरला पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशाच्या पूर्वाेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पाहावयास मिळेल, तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल, अशी माहिती अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात ५.३० वाजता, तर मुंबई येथून ०६.०१ वा. चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होईल आणि सर्व ठिकाणी ०७.२६ वा ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७० टक्के टक्के, तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ टक्के ग्रहण दिसेल.

विदर्भातून ग्रहण विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात चंद्र ७० टक्के पृथ्वीच्या सावलीने झाकाळला दिसेल. चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता ग्रहण दिसेल, येथे ६० टक्के भाग ग्रस्तोदित असेल. ग्रहण मध्यकाळ लगेच ०५.३५ वाजता तर ग्रहण शेवट ०७.२६ वाजता होईल. पश्चिमेकडील जिल्ह्यात काही सेकंदाच्या फरकाने उशिरा ग्रहण दिसेल. शेवटी बुलढाणा येथे ०५.४५ वाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि शेवट ०७.२६ वाजता होईल. येथे १ तास ४१ मिनिटे ग्रहण दिसेल आणि चंद्र २५ टक्के ग्रस्तोदित असेल. सर्व ठिकाणी चंद्र क्षितिजावर १० डिग्रीवर आल्या नंतरच चांगले ग्रहण पाहता येईल.