चंद्रपूर (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके यांनी आपला प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा पाठविल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला c

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मागील सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौरा झाला असून, पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या बेबीताई उईके या सर्व सामान्य कुटंबातील आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी हिरहिरीने प्रशासनासमोर मांडले आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झालीत. त्यांच्या प्रामाणिक कार्याचे शरद पवार यांनी कौतुकही केले आहे. परंतु, आज त्यांनी अचानक राजीनामा दिला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उईके यांनी राजीनामा पाठविला आहे. राजीनामा देण्यामागे त्यांनी वैयक्तिक कारण सांगितले आहे. राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडणार नाही, असेही उईके म्हणाल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच वैद्य यांचे राजीनामानाट्य घडले. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत.