मुंबई (प्रतिनिधी) : आ. बच्चू कडूंनी सौदा केला म्हणणे चुकीचे आहे. बच्चू कडू माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले, अशी जाहीर कबुली सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे महाविकास सरकारच्या पाडापाडीमागे भाजप असल्याचे पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आले आहे.

ते म्हणाले, आमदार बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते. आम्हाला सरकार बनवायचे आहे. तुम्ही सोबत हवे आहात आणि ते गुवाहटीला गेले. बच्चू कडू यांनी कुणाशी सौदा केला, काही उलट सुलट केले हे म्हणणे चुकीचे आहे. बाकीच्या आमदारांचे मला माहीत नाही. मी केवळ कडूंना फोन करून सांगितले. म्हणजे बाकीच्या आमदारांनी सौदेबाजी केली असे म्हणत नाही, पण माझ्या फोनवर कुणी गेले नाहीत. माझ्या कॉलवर गेलेले केवळ एकटे बच्चू कडू आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

फडणवीस म्हणाले, माझी ही पक्की माहिती आहे की, जे लोक गुवाहटीला गेले ते पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेऊन गुवाहटीला गेले. कारण त्यांना माहिती होते जरा आपल्याकडे लागणारी संख्या नसेल, तर आपले पद देखील जाऊ शकते. तरीही सर्वांचा विश्वास शिंदेंवर होता. यामुळे आम्ही रवी राणा आणि बच्चू कडू यांना समजून सांगितले. यावर बोलताना दोघांनी हे सर्व रागारागातून स्टेटमेंट झाले असे सांगितले आहे. दोघांनी हे विधान रागाच्या भरात झाल्याचे सांगितल्याने आमच्याकडून हा विषय संपलेला आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.