नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा सुरू केला आहे. या रोजगार मेळाव्याचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी ७५ हजार तरुणांना नियुक्त पत्र देत या रोजगार मेळाव्याला सुरुवात केली आहे. त्यासोबतच ५० केंद्रीय मंत्र्यांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास २० हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर दिले आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठे गिफ्ट दिल्यामुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

७५ हजार तरुणांना नियुक्त पत्र देत पंतप्रधानांनी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आजचा दिवस भारतातील युवा शक्तीसाठी महत्त्वाचा आहे. गेल्या ८ वर्षात देशात सुरू असलेल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोहिमेला आज आणखी एक दुवा जोडला जात आहे. रोजगार मेळाव्याची ही एक साखळी आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वावलंबी भारताच्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये आमचे उद्योजक, शेतकरी, सुविधा आणि मॅन्युफॅक्चरिंग असोसिएट्स यांचा मोठा वाटा आहे.’ येत्या काही महिन्यांत लाखो तरुणांना भारत सरकारकडून वेळोवेळी नियुक्त पत्र दिले जातील, असे देखील त्यांनी सांगितले.

मोदींनी सांगितले की, ‘कर्मयोगींचा संकल्प मोठा असतो. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ७-८ वर्षात आम्ही १० वरून ५ वर झेप घेतली आहे. हे शक्य होत आहे कारण गेल्या ८ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवांमुळे अडथळे निर्माण होत होते त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत. ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजने’अंतर्गत देशातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत, स्किल इंडिया मोहिमेच्या मदतीने आतापर्यंत देशातील १.२५कोटीहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.’