मुंबई : दरवर्षी दिवाळीच्या काळात एस.टी. प्रवास भाड्यात होणारी वाढ आजपासून लागू झाली आहे. आजपासून एसटी प्रवासामध्ये ५ रुपये तर ७५ रुपयांची वाढ झाली असून ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे.

एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात महसूल वाढीसाठी दरवर्षी अशी वाढ लागू करण्यात येते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. 

ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली असली तरी दुसरीकडे मात्र प्रवाशांना ऐन दिवाळीत आर्थिक झळ सोसून प्रवास करावा लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ ही प्रवाशांना परवडणारी नसून हे भाडेवाडी कमी करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि  विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.