मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे. ‘ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा,’ असे राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

राज ठाकरे पत्रात म्हणतात की, ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केले आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलेच आहे, पण तेवढे पुरेसे नाही.

सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की, सरकार पंचनाम्याचे आदेश देत, पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पाहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे.

कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसानभरपाई दिली जाते ती पुरेशी नाही. तिचा देखील पुनर्विचार करावा. लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल, याकडे राज्य सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.