मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी ऋतुजा लटकेंकडून मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भाजपकडून मुरजी पटेल हे अंधेरीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मशाल विरुद्ध कमळ असा थेट सामना रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंच आहे. मतदान ३ नोव्हेंबर रोजी, तर मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि मिलिंद काशीनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.
ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेला दिलेल्या आदेशानंतर त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून आज त्या अर्ज दाखल करणार आहेत. सामान्य कर्मचाऱ्याचा राजीनामा मंजूर करण्यास पालिका एवढे महत्त्व का देते, अशी विचारणाही कोर्टाने गुरुवारी केली यामुळे आज सकाळीच त्याच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आला.
उद्धव ठाकरे शिवसेनेकडून ऋतुजा लटके या उमेदवार आहेत. भाजप आणि शिंदे सेनेकडून कोण उमेदवार असेल, याबाबत रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खलबते सुरू होती. रात्री उशिरा मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. पटेल कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने लटके-पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे.
पालिकेचे वकील अॅड. अनिल साखरे म्हणाले, लटकेंविरुद्ध एकाने १२ ऑक्टोबरला भ्रष्टाचाराची तक्रार दिली आहे. याचा तपास करायचाय. नियमानुसार राजीनाम्यासाठी ३० दिवसांपूर्वी नोटीस देणे आवश्यक आहे. राजीनामा दिल्यानंतर लटके कार्यालयात आल्याच नाहीत. लटकेंच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढत त्यांनी ३ रोजी राजीनामा दिला असताना आत्ताच तक्रार कशी आली, असा प्रश्न केला.