कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत जोडो यात्रा अंतर्गत कोल्हापुरात उद्या (शनिवार) काँग्रेसच्यावतीने भव्य मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा ऐतिहासिक दसरा चौकात होत असून देशासह राज्य आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.तसेच जिल्ह्यातील १,२३९ गावे, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर, तसेच जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात १३ एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा कोल्हापूर जिल्ह्याच्या गावोगावी दाखविण्याचा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली आहे. या भारत जोडो यात्रेला राज्यात ठिकठिकाणी पाठिंबा मिळत आहे. या यात्रेला पाठींबा दर्शवण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून उद्या सायंकाळी पाच वाजता भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. उद्या राजर्षी शाहू समाधीस्थळाला अभिवादन करून या मेळाव्याला सुरुवात करण्यात येणार आहे.

या मेळाव्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दहा हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच आ. पी. एन. पाटील, आ. श्रीमती जयश्री जाधव, आ. जयंत आसगांवकर, आ. ऋतुराज पाटील, आ. राजूबाबा आवळे, गुलाबराव घोरपडे, प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, रंगराव देवणे, संजय पोवार-वाईकर, यांच्यासहीत काँग्रेसचे सर्व माजी आमदार, सर्व तालुकाध्यक्ष, सेलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.