मुंबई (प्रतिनिधी) : उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील  यांचा काम करीत असताना पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बळीराजाच्या चार मुलींचे काय होणार, या चिंतेत असलेल्या कुटुंबाच्या आणि त्या मुलींच्या मदतीला आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे देवासारखे धावून गेले. ‘त्या’ मुलींचे संपूर्ण पालकत्व घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

या घटनेनंतर कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. कुटुंबात ४ मुली असल्याने त्यांचे शिक्षण लग्न व भविष्याची चिंता या मुलींच्या आईला होती. अशा संकटात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या कुटुंबाचे पालकत्व घेत जबाबदारी स्वीकारली.

यापुढे या चार मुली माझ्या भाच्या असून, त्यांची मी जबाबदारी घेतो. मनीषाताई आता यापुढे काळजी करू नका, असे सांगत या कुटुंबाला धीर दिला. सुरवसे कुटुंबीय हे उस्मानाबादमध्ये रामनगर येथे राहतात. त्यांची व्यथा सनी पवार या सामाजिक कार्यकर्त्याने सावंत यांच्याकडे मांडली. त्यावेळी सावंत यांनी जबाबदारी घेतली. याप्रसंगी धनंजय सावंत, केशव सावंत, डॉ. तानाजी सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, दत्ता साळुंके, जिल्हाध्यक्ष सूरज साळुंके, अविनाश खापे, अजित लाकाळ यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यापूर्वी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे कुटुंबाचे पालकत्व स्वीकारत १० लाखांची मदत केली होती. तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षण व नोकरीची जबाबदारी घेतली होती.