कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राष्ट्र सशक्त आणि समर्थपणे उभे राहण्यामध्ये जनजाती समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजातील अनेक शुरवीर महापुरूषांनी देशासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे. जनजाती समाज स्वातंत्र्य युध्दामध्ये सर्व शक्तीनिशी लढला होता, हा इतिहास आहे, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना केंगले-साबळे यांनी केले.

राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग, केंद्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनुसूचित जमातीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान या विषयावर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते.

केंगले-साबळे म्हणाल्या, एकेकाळी जनजातीचा समाज अत्यंत प्रगत व आर्थिकदृष्टया सक्षम होता. परंतु, भारतामध्ये इंग्रजांचे राज्य आल्यानंतर या समाजाचे इंग्रजांनी फार मोठया प्रमाणामध्ये शोषण केल्यामुळे आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती मोठया प्रमाणात ढासळली. आदिवासी समाजाबद्दल द्वेष निर्माण होण्यासाठी इंग्रज त्यांना दरोडेखोर संबोधत होते. हे फार अन्यायकारक होते.

राष्ट्रीय संयोजक दिलीप पवार म्हणाले, आदिवासी पाडयातील लोकांनी जंगलांचे संरक्षण केल्यामुळे आज विविध प्रकारच्या वनौषधी व वनसंपदा मोठया प्रमाणात आबादीत राहण्यास मदत झालेली आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्य सरकारे विविध योजना राबवत आहेत. डोंगराळ भागांमध्ये आज शिक्षणाची गंगा प्रवाहीत झालेली आहे. या समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर झालेले आहेत.

शामलाल कॉलेज, दिल्ली विद्यापीठ येथील प्रा. विवेकानंद नर्तम म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनुसूचित जमातीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे योगदान समजून घेणे आवश्यक आहे. जनजाती समाज आणि जनजाती नायकांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, ज्या भागामध्ये अनुसूचित जनजातिचे विद्यार्थी आहेत, त्या भागांमध्ये पोहचून त्यांना अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास उद्रुक्त केले पाहिजे. विविध वनौषधीच्या संवर्धनाची या समाजाकडे असलेल्या ज्ञानाची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. प्रारंभी भारत माता आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. एस. पी. हंगिरगेकर, सुश्मिता खुटाळे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रमोद पांडव, उपकुलसचिव विलास सोयम, डॉ.अवनिश पाटील, डॉ. अविनाश भाले आदी उपस्थित होते.