सांगली (प्रतिनिधी) : तासगाव तालुक्यातील विसापूर येथे किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी खोरे मारून खून केल्याची घटना मध्यरात्री घडली. या प्रकारानंतर पतीने पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विसापूर येथे माहेरवाशीण म्हणून आलेल्या काजल बिरजू जाधव हिचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास पती बिरजू याने डोक्यात खोरे मारल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काजल हिचा आळसंद येथील बिरजू जाधव याच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. त्यानंतर किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता. हा वाद मिटविण्याचा बर्‍याचवेळा दोन्ही बाजूच्या मंडळींनी केला होता; मात्र वाद मिटविण्याचे प्रयत्न असफल झाल्याने काडीमोड घेण्याची तयारीही सुरू करण्यात आली होती. या दरम्यान सोमवारी रात्री बिरजू पत्नीकडे आला. मध्यरात्री दोघामध्ये पुन्हा वाद झाला. या वादातच पहाटेच्या सुमारास लोखंडी खोरे डोक्यात मारले. हा घाव वर्मी लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.