मुंबई (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केल्यानंतर चर्चेला ऊत आला आहे. फडणवीस यांची पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये निवड झाल्यानंतर ही मागणी पुढे आल्याने या चर्चेला वेगळा रंग आला आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयावर बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे एक सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्यांना एका समाजापुरते बंदिस्त करणे योग्य होणार नाही. ते सर्व समाजाचे आहेत. एका समाजाचे असू शकत नाहीत. सर्वच समाजातील लोक त्यांना पाठींबा देतील यात शंका नाही.

अ. भा. ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली जावी, अशी मागणी केली आहे. भाजपाने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या चर्चेत आहेत. यानिमित्ताने भाजपाने फडणवीस यांचे महत्त्व अधोरेखित केले असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले असल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात आज पुण्यात माध्यमांनी संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. शिवसह्याद्री यूथ फाऊंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ते आले होते.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे म्हणाले, ‘कोण काही बोलत असेल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला वाटते देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाचे आहेत. ते एका समाजाचे असू शकत नाही. ते मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत. जर खासदार व्हायच असेल, तर ते एका समाजाचे होऊ शकत नाही. त्यांना सर्व समाजातील लोक पाठिंबा देतील, असे माझ मत आहे. ते एक चांगले नेतृत्व असून, त्यामध्ये काही दुमत नाही किंवा शंका नाही; पण शेवटी राजकारणात वेळेवर काही निर्णय घेतले जातात.’

मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे, या प्रश्नावर संभाजीराजे यांनी,  ‘आपली भूमिका मांडण्याचा अधिकार संघटनांना असतोच; पण तरीही असे काही करू नका, जेणेकरून कायदा आपण हातात घेऊ.’  तसेच दहीहंडीला क्रीडा प्रकार म्हणून खास दर्जा दिला जात असेल, तर स्वागतच आहे. गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षणही ठीक आहे; पण गरीब मराठ्यांच्या आरक्षण मागणीचे काय? त्यांनाही आरक्षण द्यावेच लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवण्याचा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिला.