कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ यांच्या वतीने यंदा ‘भगव्या दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

कोरोनामुळे गेले २ वर्षे सर्वच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. गेली १५ वर्षे राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली भगव्या दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. यंदा दहीहंडीतील विजेत्या संघास १.५० लाख रुपये व मानपत्र बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय सलामी आणि  थरांसाठी रोख रक्कमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी खास ‘खेळ पैठणी’च्या स्पॉट गेमसह आकर्षक बक्षिसेही महिलांना देण्यात येणार आहे. गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. सुरवातीस श्री शाहू गर्जना ढोल वाद्य पथकाकडून सलामी दिली जाणार आहे. ‘भगवी’ दहीहंडीचे उद्घाटन राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते दि.१९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी चौक येथे होणार आहे.

शिवसेनेच्या या दहीहंडीचे संयोजन शाखाप्रमुख आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कपिल केसरकर, अध्यक्ष राहुल अपराध, अमित जाधव, रुपेश डोईफोडे, अभिलाष चव्हाण, सागर शिंदे, उदय शिंदे, जयाजी घोरपडे, केदार भुर्के, शाहरुख बागवान, पाप्या बागवान, निहाल मुजावर आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.