मुंबई : अभिनेता आमिर खान मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगमी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’मुळे चर्चेत आहे. निवडक चित्रपट करणाऱ्या आमिर खानने १० वर्षांपूर्वी ‘महाभारत’ या पौराणिक ग्रंथावर एक बिग बजेट चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचे हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही; पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमिरने ‘महाभारत’ ग्रंथावर पौराणिक चित्रपट बनवण्याबद्दल माहिती दिली आहे.

सध्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या आमिरने या विषयावर चित्रपट तयार करण्याची भीती वाटत असल्याचे आमीर ने सांगितले. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, “जेव्हा तुम्ही ‘महाभारत’ सारख्या विषयावर चित्रपट तयार करत असता तेव्हा तो केवळ चित्रपट नाही तर एक महायज्ञ असतो. त्यामुळे मी यासाठी आता अजिबात तयार नाहीये. हे मोठ्या पडद्यावर मांडायची मला अजूनही भीती वाटतेय. ‘महाभारत’ तुम्हाला कधीच निराश करणार नाही; मात्र तुम्ही हा विषय हाताळताना काही कारणांनी प्रेक्षकांची निराशा होऊ शकतात.’