मुंबई : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून पावसाचा नवा अंदाज देण्यात आला आहे. पुढचे ४ दिवस राज्यात असेच हवामान राहील; पण रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रविवारपर्यंत उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

हवामान खात्याने सांगितले की, मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान आहे. पाऊस नसल्याने व आर्द्रतेची उच्च पातळी असल्याने अस्वस्थता निर्देशांक खूप जास्त आहे. मुंबईकर पावसाची वाट पाहत असले तरी रविवारपर्यंत हवामानात कोणताही बदल होणार नाही. तर येत्या २-३ दिवसांत मुंबईत पावसाची शक्यता असेल. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या व स्वत:ला हायड्रेट ठेवा, अशाही सूचना देण्यात आल्या आहे.