कोल्हापूर (प्रतिनिधी) : महसूल विभागाचा खूप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, भूसंपादन अधिकारी विवेक काळे, सनदी लेखापाल भाऊसो नाईक, कलाकार नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

संजयसिंह चव्हाण म्हणाले, जनसामान्यांचे काम करत असताना महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्याची काळजी करण्याबरोबरच आपल्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या निकडीनुसार प्रसंगी १५ तासांहून अधिक तास काम करावे लागते. महसूल विभागात काम करत असताना मुलांच्या शिक्षणाकडे, स्वत:च्या आरोग्यकडे, भविष्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले काम प्रामाणिकपणे व चोखपणे करावे, लोकाभिमुख होऊन लोकांना कामातून चांगली सेवा द्या. नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या अनुभवातून शिकायला हवे, यासाठी परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे, असे चव्हाण म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी किशोर पवार म्हणाले, महसूल विभागाच्या कामात बदल होत असून, दिवसेंदिवस कामाची व्याप्ती वाढत आहे. महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची प्रतिमा सांभाळून काम करणे गरजेचे आहे. नागरिकांशी संबंधित कोणतेही काम टाळू नये. उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगितले. सनदी लेखापाल भाऊसो नाईक यांनी सुरक्षित गुंतवणुकीबाबत माहिती दिली. कलाकार नितीन कुलकर्णी यांनी हसत जगण्याबाबत मनोरंजनातून मौलिक सूचना केल्या.

प्रास्ताविकात दत्तात्रय कवितके म्हणाले, शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे काम महसूल विभाग करतो. तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार अर्चना कापसे यांनी आभार मानले.