मालेगाव : शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद दिघे यांच्याबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यादिवशी या राज्यात आणि देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही’ असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील सभेत केले आहे.

‘आनंद दिघेंनी वयाची ५० वर्षेही पूर्ण केली नव्हती, तेव्हा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माझ्या आयुष्यातली दुःखद घटना आहे. एका दिवसात दोन दिवसाचे काम करणारे आनंद दिघे होते. याचा साक्षीदार मी तर आहेच; पण माझ्यासारखे अनेक लोक आहेत. बाळासाहेब ठाकरेंनाही हेवा वाटावा, असे काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केले आहे, असे ते म्हणाले.

धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून तो प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून केला. या महाराष्ट्रात आनंद दिघे यांच्यावरील सिनेमा भरभरून चालला. या सिनेमाला १६ बक्षिसे मिळाली; मात्र काही लोकांना हा सिनेमा रूचला नाही, पटले नाही. कारण धर्मवीरांचे कार्य आम्ही लोकापर्यंत पोहोचवले, असेही शिंदे म्हणाले.

आम्ही कुठलीही बंडखोरी किंवा गद्दारी केलेली नाही. आम्ही क्रांती घडवली. जो अन्याय होत होता त्याविरोधात आम्ही क्रांती केली. याची दखल फक्त महाराष्ट्राने नाही तर जगातल्या ३३ देशांनी याची दखल घेतली. तरीही आमच्या माथी गद्दारांचा शिक्का लावला गेला. एवढा मोठा उठाव का झाला याचे मूळ शोधले पाहिजे; मात्र तसे झालेले नाही. आमच्यावर शिक्के मारले जात आहेत; मात्र जनतेने आम्हाला स्वीकारले आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.