कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील हिल रायडर्स अँड हायकर्स फाऊंडेशनतर्फे आयोजित पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेस बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली. अत्यंत ऊर्जादायी वातावरणात सुरु झालेल्या या मोहिमेत माजी गृहराज्यमंत्री व आ. सतेज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

घनदाट धुके, थंडगार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात ‘जय भवानी…जय शिवाजी…शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवाकाशीद व बाजीप्रभू देशपांडे की जय…या घोषणांनी संपूर्ण पन्हाळगड दणादणून गेला होता.

१२ व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड या सह्याद्री पर्वत रांगेतील मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. शिवछत्रपती व त्यांच्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणार्थ अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या जाज्वल्य पराक्रमी इतिहासाच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने विविध शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था- संघटनांच्या वतीने बोचरा बारा, प्रचंड पाऊस आणि सह्याद्री पर्वत रांगेतील काटेकुटे, चिखल, दगड-धोंड्यांनी माखलेल्या खडतर डोंगरदऱ्यांच्या मार्गावरून ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते.

महाराष्ट्राच्या लढवय्या इतिहासातही अशीच एक अलिखित परंपरा आहे. ही परंपरा म्हणजे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ अशी साहसी पदभ्रमंती मोहीम. बोचरा बारा, प्रचंड पाऊस आणि सह्याद्री पर्वत रांगेतील काटेकुटे, चिखल, दगड-धोंड्यांनी माखलेल्या खडतर डोंगरदऱ्यांच्या मार्गावरून ही पदभ्रमंती होते.

१९८६ पासून हिल रायडर्स फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी या पन्हाळा ते पावनखिंड या राज्यस्तरीय ऐतिहासिक पदभ्रमंतीचे अत्यंत नियोजनबध्दपणे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेला संघर्ष तरुण पिढीला कळवा यासाठी अशा मोहिमांचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. या आणि यासारख्या कार्यक्रमांचे कायमस्वरुपी आयोजन करून डेस्टिनेशन कोल्हापूरच्या माध्यमातून कोल्हापूरला जागतिक नकाशावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.