मुंबई (प्रतिनिधी) : ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो, असे स्पष्टीकारण भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाला घेरले. आता स्वतः भगतसिंह कोश्यारी यांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली.

‘मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही,’ असे स्पष्टीकरण कोश्यारी यांनी केले.

कोश्यारी म्हणाले, ‘नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये.’