मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीवाल्यांनी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा झगडा लावून दिला असे म्हणत दिल्लीवाल्यांना महाराष्ट्रात मराठी माणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायची आहेत’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकावर केली आहे.  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला.

‘देशातील लोकशाहीचे भवितव्य, विरोधी पक्षांना खतम करण्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’चा गैरवापर सुरू आहे. भाजपात आज बाहेरून आलेल्यांना मुख्यमंत्रीपदापासून विरोधी पक्षनेते पदापर्यंत सर्वकाही दिले जात आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले. असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

त्यांनी भाजपकडून विरोधकांसाठी सुरू असलेल्या षडयंत्राचाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, खोट्या आरोपांखाली आधी अटक, मग आरोप ठरवतील आणि कालांतराने त्यातून ते सुटतात. तोपर्यंत तुम्ही त्यांचे आयुष्य बरबाद केलेले असते; मात्र कुणाचे आयुष्य बरबाद करून कोणाला सुख लाभत असेल असे मला वाटत नाही. अशी माणसे कधी सुखात राहू शकतील आणि शकतात यावर माझा विश्वास नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, आता जे काही बदनामीकरण चाललेय ते घाणेरड्या, अश्लाघ्य आणि विकृत पद्धतीने चालले आहे. हे कुणाला ‘लाभणार’ नाही! असे दिसते की, विरोधी पक्षात जे आहेत त्यांच्यावर आधी आरोप करायचे, बदनाम करायचे आणि मग कुंभमेळ्याला न्यायचे. त्यांना नामोहरम करायचे, अटकेची भीती दाखवायची. रोज त्यांच्यावर ‘हल्ले’ करायचे आणि हेच बदनाम लोक त्यांच्या पक्षात जातात तेव्हा यांची तोंडं बंद होतात.

नितीन गडकरी बोलले होतेच की, आमच्याकडे ‘वॉशिंग मशीन’ आहे. लोकांना घेऊन आम्ही ‘पुण्यवान’ करतो. त्यांच्याकडे जे लोक काही आरोपांमुळे गेलेत, त्यांचे पुढे काय झाले ते पण पाहावे लागेल. सध्या नवीन लोकांना त्रास दिला जातोय. हे सशक्त राज्यकर्त्यांचे लक्षण नाही, ही भीती आहे. कारण शिवसेनेच्याच ज्या लोकांवर एक महिन्यापर्यंत, २४ तासांत तुरुंगात जातील, फासावर जातील असे आरोप होत होते, तेच लोक त्यांच्याकडे गेले आहेत. आता ते पवित्र झाले असतील. तुमच्यावरही असे आरोप सुरू आहेत. तुम्हालासुद्धा ते अटक करणार असे वातावरण तयार केले जात आहे. फक्त यंत्रणांचा गैरवापर. दुसरे काय? असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर आसूड ओढले.