मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ  यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी विकी कौशल आणि कतरीना कैफने मुंबई पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. याआधी बॉलिवूडचा सुलतान अर्थात अभिनेता सलमान खान  आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी आली होती.

आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती सोशल मीडियावर  कतरिनाला बराच वेळ स्टॉक करत होता. विक्की कौशलने त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला होता, तरीही तो तसाच करत राहिला आणि शेवटी विक्कीने हे पाऊल उचलले. या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी विकी आणि कतरिनाने थेट सांताक्रुझ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘तुझा मूसवालाही करणार’, असे या पत्रात लिहिले होते. याप्रकरणाचा तपास देखील मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानला संरक्षण देण्यात आले होते.

दरम्यान, कतरिना कैफने नुकताच आपला वाढदिवस मालदीवला साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. विकी आणि कतरीनाने ९ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्न केले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.