रत्नागिरी : तालुक्यातील जयगडजवळ समुद्रात मंगळवारी सकाळी एक सिंगापूरचे तेलवाहू बार्ज उलटले असून, त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेलाचा तवंग पसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. समुद्र किनारी वाहून येणाऱ्या कोणत्याही वस्तूंना हात न लावण्याच्या सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत.
मंगळवारी सकाळी सिंगापूर कंपनीचे मोठे तेलवाहू बार्ज बुडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. हे बार्ज सिंगापूरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, हे बार्ज पलटी झाल्याने किनारा परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने जयगड समुद्रात पलटी झाले. सोमवारी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. सिंगापूर येथून तेल घेऊन आलेले बार्ज रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील १३ नॉटीकल मैल खोल समुद्रात आले असता सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उलटले. सुदैवाने या बार्जवरील कर्मचारी सुरक्षित आहेत.