कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम्ही सभासदांना जाहीरनामा नव्हे तर वचननामा दिला आहे. हा वचननामा येत्या पाच वर्षात पूर्ण केला जाईल. असा विश्वास राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचे सुकाणू समिती प्रमुख जोतीराम पाटील यांनी व्यक्त केला. ते शिक्षक बँकेच्या करवीर शाखेतील प्रवेशावेळी बोलत होते.

जोतिराम पाटील म्हणाले की, सभासदांनी मोठ्या विश्वासाने शाहू आघाडीला निवडून दिले आहे. या विश्वासाला पात्र राहून पुढील पाच वर्ष आमचे संचालक कामकाज करतील. सभासद हिताला प्राधान्य देऊन बँकेच्या उन्नतीसाठी झटतील आणि वचननाम्यामध्ये दिलेल्या शब्दांची पूर्तता करतील. शिक्षक बँकेला महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक बनवण्याचा आमचा मनोदय असून यामध्ये करवीर शाखा आपला सिंहाचा वाटा उचलेल.

यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांनी, सभासदांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवून सत्ता दिली आहे. सभासदांच्या या विश्वासाला जागून आपण बँकेला प्रगतीपथावर न्यावे असे आवाहन केले.

करवीर शाखेचा प्रवेश अनोख्या पद्धतीने झाला. यावेळी सजावट, हार तुरे, अल्पोपहार तसेच अनुषंगिक बाबीवर होणारा सर्व खर्च हा करवीर संचालकांनी केला. शाखेवर कोणताही खर्च बसविला नाही. यातून काटकसरीच्या कारभाराची चुणूक दाखवली. यावेळी उपस्थित सर्व सभासदांना संचालकांच्या वतीने कृतज्ञता भेट म्हणून कपबशी देण्यात आली.

करवीर तालुका संचालक एस. व्ही. पाटील म्हणाले, अत्यंत काटकसरीने व पारदर्शक कारभार करून सभासदांची आर्थिक उन्नती साधने हेच आमचं ध्येय असेल. या पुढील कालखंडात अशीच वाटचाल आम्ही करू. बँक संचालक सुरेश कोळी म्हणाले, सर्वांच्या एकजुटीमुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. करवीर तालुक्याचे या विजयात मोठे योगदान आहे त्यामुळे करवीर शाखेत येणारा प्रत्येक सभासद हा समाधानानेच बाहेर पडेल अशी विनम्र सेवा कर्मचाऱ्यांनी द्यावी. संस्थेच्या आर्थिक उन्नतीसाठी सभासदांनी केलेल्या सूचनांचा नेहमीच आदर केला जाईल. आम्ही विश्वस्त  आहोत खरे संचालक हे सामान्य सभासदच आहेत.

यावेळी चेअरमन अर्जुन पाटील व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे, प्रा.मधुकर पाटील, सुभाष चौगले, गौतम वर्धन, संदीप मगदूम, सुनील पाटील, ए. के. पाटील, विलास चौगुले, बाळासाहेब पवार, रघुनाथ खोत, बाजीराव पाटील, राजीव परीट, संचालक वर्षा केनवडे, सुनील एडके, बाळासाहेब निंबाळकर, शिवाजी रोडे-पाटील, हरिदास वर्णे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.