मुंबई (प्रतिनिधी) : तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते, पण आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. उस्मानाबादचे नामांतर धाराशिव हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाणार आहे. आमच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांची मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार हे अल्पमतात असूनही राज्यातील काही शहरांच्या नामांतराचा घाईगडबडीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांबाबत पुढे काही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आम्ही नामांतराच्या निर्णयांना स्थगिती दिली होती. आम्ही पूर्ण बहुमतात असताना हे निर्णय घेतल्याने या निर्णयांना पुढे कोणतीही अडचण येणार नाही.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’, असे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पुढील अधिवेशनात नामांतराबाबतचे हे ठराव मांडून त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येईल. त्यानंतर हे ठराव केंद्राकडे पाठवले जातील. केंद्राकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी, म्हणून राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करणार आहे.

एमएमआरडीए प्रशासनाला रस्ते, वाहतुकीच्या प्रकल्पासाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, एमएमआरडीएतर्फे शिवडी न्हावा शेवा प्रकल्पासारखे अनेक प्रकल्प मुंबई परिसरात सुरु आहे. त्यामुळे मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. हे प्रक्लप रखडू नये म्हणून एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींची शासनहमी सरकार घेणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने सुरु केलेली अनेक कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. कोविड व इतर कारणामुळे हे प्रकल्प रखडले होते, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदे यांनी मविआ सरकारला लगावला.