आजरा (प्रतिनिधी) : येथील पुरातन असलेल्या व्हिक्टोरिया पुलावर एप्रिल महिन्यात कंत्राटदाराने दुरुस्तीच्या नावाखाली पुलावर उत्खनन केले आहे. मोठे खड्डे पडल्यामुळे या पुलास धोका पोहोचला आहे. अनेक वाहने खड्डयात अडकल्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. या खड्ड्यातून पाणी मुरल्याने पुलास धोका निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदार कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आजरा तहसीलदार यांच्याकडे मनसेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत ४ दिवसांत योग्य ती कार्यवाही न झाल्यास पुढील होणाऱ्या कार्यवाहीस प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन मनसेचे कार्यालय प्रमुख दिलीप जाधव यांना दिले आहे. या निवेदनावर तालुकाप्रमुख अनिल निऊंगरे, सुधीर सुपल, आनंदा घंटे, पूनम परुळेकर आदींच्या सह्या आहेत.