मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार आहे. या निवडणुका जाहीर झाल्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २०  जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून, लगेच २२  ते २८  जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. पुणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२  नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.

भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद या सहा नगरपरिषदा ‘अ’ वर्गातील आहेत. याशिवाय ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा गतिमान होणार आहे.