आजरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. तर भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादी हा नंबरचा पक्ष असेल, असेही ते म्हणाले. ते आजरा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. 

आ. मुश्रीफ म्हणाले की, गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात यश आले आहे. गेल्या २२ वर्षापासून रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प नुकताच पूर्ण झालेला आहे. उचंगी प्रकल्पाचीही तीच अवस्था होती. तो प्रकल्पही पूर्णत्वाला आला आल्याचे सांगितले.

आ. राजेश पाटील म्हणाले, आ. हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने आंबेओव्हळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. उचंगी प्रकल्प पूर्णत्वास आला असून आ. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत लवकरच पाणीपूजन करणार असल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, माजी जि.प. सदस्य वसंतराव धुरे, माजी पं.स. सभापती विष्णूपंत केसरकर आदी उपस्थित होते.