मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतले आहेत. तत्पूर्वी आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ कसे असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे.

यावर ट्वीटद्वारे  स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे. एकनाथ शिंदे हे आजच राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवाय शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळास भेट देणार आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.