मुंबई (प्रतिनिधी) : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्यमंत्र्याकडील खातेवाटपात बदल
शंभूराज देसाई यांच्याकडील खाती संजय बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज पाटील, (रा.उ.शु.) यांच्याकडे देण्यात आली आहेत.
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनील तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) यांच्याकडे देण्यात आली आहेत.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील खाती प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज पाटील, राज्यमंत्री (ग्रामविकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) यांच्याकडे देण्यात आली आहेत.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडील खाती आदिती तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे देण्यात आली आहेत.