मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाविकास आघाडी स्थापनेपासून अनैसर्गिक आघाडी होती. स्थानिक कार्यकर्त्यांनाही ही आघाडी अडचणीची ठरत होती, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

‘महाविकास आघाडी सरकार हेच मुळात अनैसर्गिकरीत्या तयार झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने कौल दिला होता. अजूनही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना हे सरकार कायम ठेवायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरमधले शेवटचे काही महिने किंवा वर्ष उपभोगून घ्यावेत, अशी टीका उदयनराजे यांनी केली.

‘खरे तर, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित काम करू शकत नाहीत. कार्यकर्ते लोकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी मतदान करायला कसे सांगणार? ही आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अडचणीचीच असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.