मुंबई (प्रतिनिधी) :  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४०आमदार आहेत. शिंदे यांनी जरी ही बंडखोरी केली असली तरी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खूप पूर्वी याची कुणकुण लागली होती. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल इशाराही दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट दुरापस्त झाल्याने फक्त शिवसेनेचे नेतेच नव्हे तर महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज होते.

उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत नव्हते. त्यामुळे अनेक नेते उद्धव ठाकरेंपासून नाराज होते. शरद पवार यांना ही बाब कळाल्यानंतर किमान ४-५ महिन्यांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता. शिवसेनेत बंडखोरी होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. तसेच नेत्यांची भेट घ्यावी आणि त्यांचे प्रश्न ऐकून घ्यावेत असा सल्लाही पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता.

एकीकडे शिवसेना नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क होत नव्हता, तर दुसरीकडे शरद पवार यांनाही मुखमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली नव्हती. अनेक वेळेला पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नव्हती. यामुळेही पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज झाले होते.

सरकारमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते तसेच किंमत दिली जात नाही अशी खंत अनेक नेत्यांनी खासगीत व्यक्त केली होती. एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, अनेकवेळेला एखाद्या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी महत्त्वाची होती; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्कच झाला नाही, असे या काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत हाय कमांडकडे म्हटले होते.

शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अपक्ष आणि छोट्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. या आमदारांनीही मविआतील इतर नेत्यांप्रमाणे तक्रार केली आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देणार्‍या एका आमदारानेही सांगितले की, उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ४५ वेळा फोन केला; परंतु त्यावर उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अनेक अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेपासून अंतर ठेवले होते.