कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ आदी उपस्थित होते.

दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास बफर स्टॉक मधून खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये , असे आवाहन त्यांनी केले.

भुसे म्हणाले, राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ५० टक्के निधी राखीव ठेवण्यात येत आहे. कोल्हापुरी गुळाच्या नावावर अन्य राज्यातील गुळाची विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ तांदूळ, सांगलीचे बेदाणे (मनुके) व हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी या उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठीही सहकार्य करु, असेही भुसे म्हणाले.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजे १ जुलै रोजी ‘कृषी संजीवनी सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद, त्यांचे योग्यपद्धतीने पोषण व्हावे, यासाठी ‘किट’ देण्यात येणार आहे, असे सांगून भुसे म्हणाले, आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ‘किट’ घ्यावे व जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वितरीत करावे, असे आवाहन त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना उद्देशून केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे पश्चिम महाराष्ट्रात  शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऊस उत्पादकता वाढ मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली.